विषारी दारुमुळे घडलेल्या अशा 7 घटना, ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता

फोटो स्रोत, Getty Images
नुकतंच पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे विषारी दारूच्या सेवनामुळे 15 जणांचा बळी गेला. भारतात यापूर्वीही स्वस्त आणि बनावट दारू पिण्यामुळे विषबाधा होऊन मृत्यू होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.
यामध्ये दगावलेल्यांची संख्या कुठे दुहेरी आकड्यात असते, तर काही ठिकाणी ही आकडेवारी 100 च्या वरही गेलीय. अशी एखादी घटना घडली की पोलीस, प्रशासन आणि सरकार अलर्ट होतं. लगेच धडक कारवायांना सुरुवात होते. अनेकांना अटक केली जाते, धाडी टाकल्या जातात.
प्रसारमाध्यमांमध्येही त्यावेळी याचं मोठ्या प्रमाणात वार्तांकन होतं. विषारी दारूचा मुद्दा देशपातळीवर चर्चेत येतो. मृतांबाबत हळहळ व्यक्त केली जाते.
संबंधित राज्याचे प्रमुख या घटनेतील जबाबदार लोकांना सोडणार नाही, असा दम भरतात. नंतर हळूहळू याची तीव्रता कमी होत जाते आणि तो विषय सर्वांच्याच विस्मरणात जातो.

फोटो स्रोत, UGC
तितक्यात देशात कुठंतरी पुन्हा असाच प्रकार घडतो. मग तो महाराष्ट्र असो, बिहार असो, तामिळनाडू असो किंवा पंजाब. पुन्हा विषारी दारूचे बळी, पुन्हा आरोप-प्रत्यारोप, अटकसत्र-धाडी यांची पुनरावृत्ती होते. पण विषारी दारूमुळे बळी जाणाऱ्या घटना काही बंद होत नाहीत.
या दुर्घटनांमध्ये जीव गमावणारे बहुतांश लोक हे हातावर पोट असणारे मजूर, कामगार असतात. स्वस्त दारू मिळत असल्याने हे लोक याचे सेवन करतात. अवैधरित्या तयार होणाऱ्या या विषारी दारूमुळे वारंवार देशात अशा प्रकारच्या घटना घडताना दिसतात.
गेल्या काही वर्षांत देशातील विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झालेल्या काही प्रमुख घटनांचा आपण आढावा घेणार आहोत.
1. पश्चिम बंगालमध्ये 150 हून अधिक जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये 2011 मध्ये घडलेली विषारी दारूची दुर्घटना ही भारतातील सर्वात भीषण घटनांपैकी एक मानली जाते. 14 डिसेंबर 2011 रोजी संग्रामपूर आणि आजूबाजूच्या भागात विषारी दारू पिल्यामुळे 150 हून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
मृतांमध्ये बहुतांश रोजंदारीवर काम करणारे मजूर, रिक्षाचालक आणि फेरीवाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी बेकायदेशीर दारू बनवणाऱ्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली.

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील 12 गावांतील लोकांनी ही दारू प्यायली होती. त्यानंतर ते आजारी पडले होते. मृतांच्या शरीरात विषारी रसायन मिथेनॉल (अँटीफ्रीझमध्ये वापरले जाणारे द्रव्य) आढळून आले होते, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.
त्यावेळी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवला होता आणि अनेक रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगितले गेलं होतं. बहुतेक पीडित हे गरीब ग्रामीण भागातील होते. तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
2. आझमगडमध्ये 42 जणांचा मृत्यू
2013 साली उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये 42 जणांचा मृत्यू झाला होता. 10 रुपयांना मिळणाऱ्या हातभट्टीच्या दारूमुळे हे मृत्यू झाल्याचे बीबीसी न्यूजने सांगितले होते.
आझमगड जिल्ह्यातील मुबारकपूर भागातील आठ गावांमधील लोकांचे बनावट दारूमुळे प्राण गेले होते.
3. मुंबईतील मालवणीत विषारी दारूमुळे 106 जणांचा मृत्यू
मुंबईच्या मालवणी परिसरात जून 2015 मध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. ज्यामध्ये 17 जून 2015 रोजी मालाडच्या मालवणी परिसरात बनावट व विषारी दारू प्यायल्याने 106 जणांचा मृत्यू झाला होता.
या घटनेत अनेक लोकांना आपली दृष्टीही गमवावी लागली होती. या दारूमध्ये मिथेनॉल हा विषारी पदार्थ आढळून आला होता. याप्रकरणी काही जणांना अटक तर काही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आलं होतं.
या दुर्घटनेतील सर्व मृत हे मालाडच्या लक्ष्मी नगर येथील झोपडपट्टीत राहणारे आणि रोजंदारीवर काम करणारे होते. त्यावेळी सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपयांची नुकसानभरपाई घोषित केली होती.
त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 26 वर्षांच्या तरुणाने शेजारच्या गुजरातमधून ही दारू बेकायदेशीरपणे आणून मुंबईतील स्थानिक विक्रेत्यांना पुरवली होती. त्यानंतर ही दारू मुंबईतील अवैध दारू विक्री केंद्रांमधून विकली होती.
4. पंजाबमध्ये हॉटेल आणि चहाच्या टपरीवर बनावट दारूची विक्री
जुलै आणि ऑगस्ट 2020च्या दरम्यान पंजाबमध्ये दुर्दैवी घटना घडली होती. बेकायदेशीरपणे बनवलेली विषारी दारू प्यायल्यामुळे किमान 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.
त्यावेळी पोलिसांनी 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकून संशयित दारूचा साठा जप्त केला होता आणि 25 जणांना अटक केली होती. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्वरीत चौकशीचे आदेश दिले होते.

फोटो स्रोत, EPA
त्यावेळी आलेल्या विविध वृत्तांनुसार, ही बेकायदेशीर दारू मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आली असावी. ती आधी रस्त्यावरील हॉटेल किंवा चहाच्या टपरी चालकांना विकली गेली होती. त्यानंतर स्थानिक लोकांमध्ये वितरित करण्यात आली होती.
अशीच घटना मे 2025 मध्ये पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मजीठा भागात विषारी दारू प्यायल्याने 23 लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जणांची प्रकृती गंभीर होती. 13 मे 2025 रोजी रात्रीच्या सुमारास ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती.
मृतांमध्ये बहुतांश लोक हे वीटभट्टीवर काम करणारे गरीब मजूर होते. या घटनेतही बनावट दारू बनवण्यासाठी मिथेनॉल वापरण्यात आल्याचे सांगण्यात येते.
5. दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारूचे 26 बळी
बिहारमध्ये डिसेंबर 2022 मध्ये कथितकरित्या विषारी दारू प्यायल्याने 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
3 डिसेंबरला बिहारच्या छपरा येथे ही घटना घडली होती. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकारासाठी जबाबदार असलेल्या लोकांविरुद्ध कडक कारवाईचं आश्वासन दिलं होतं.
बिहारमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळे जी दारू मिळेल ती खराबच असेल, जो दारू पिणार तो नक्की मरणार, असंही वक्तव्य नितीश कुमार यांनी त्यावेळी केलं होतं.
या घटनेनंतर तिथल्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला आणि एका हवालदाराला निलंबित करण्यात आलं होतं.
6. गुजरातमध्ये विषारी दारूने 31 जणांचा बळी
गुजरातमधील बोटाद जिल्ह्यातील रोजिड गावात बनावट विषारी दारू पिऊन किमान 31 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अनेक जणांची प्रकृती अस्थिर होती. या लोकांना उपचारासाठी भावनगर, बोटाद आणि अहमदाबादला पाठवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, BBC Gujarati
विशेष म्हणजे गुजरातमध्ये दारूबंदी आहे. घटना घडण्याच्या तीन-चार महिन्यांपूर्वीच याबाबत रोजिड गावाच्या सरपंचानी याबाबत तक्रारही केली होती. पण त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सरपंच जिगर डुंगरानी यांनी केला होता.
बनावट दारूचा व्यवसाय करणारे आणि पोलिसांचे लागेबंधे असल्याचे आरोप काँग्रेसने केला होता. पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना अटक केली होती. ही बनावट दारू बरवाला तालुक्यातील चोकडी गावात बनली होती.
7. तामिळनाडूमध्ये 60 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू
तामिळनाडूतील कल्लाकुरिचीमध्ये बनावट दारू प्यायल्यामुळं 60 पेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळं संपूर्ण तामिळनाडू राज्य हादरलं होतं.
कल्लाकुरिची जिल्ह्यात 18 जून रोजी विषारी दारू प्यायल्यामुळे अनेकांची प्रकृती बिघडली. मिथेनॉलयुक्त दारू प्यायल्यामुळे लोकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी, आणि डोळ्यांची जळजळ अशी लक्षणे जाणवू लागली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दारूमध्ये मिथेनॉलची भेसळ करण्यात आल्यामुळे दारू पिणाऱ्यांवर ही परिस्थिती ओढवल्याचं नंतर समोर आलं होतं. याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती.

या घटनेतील बहुतांश मृत व्यक्ती हे रोजंदारीवर काम करणारे होते. तत्कालीन मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली होती.
मे 2023 मध्येही राज्यातील विल्लुपूरम इथं झालेल्या अशाच प्रकारच्या विषारी दारुच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला होता. विल्लुपूरम जिल्हा आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांतील मच्छीमार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांकडून ही दारू विकत घेतली जात होती.
गावठी दारू प्राणघातक कशी ठरते?
देशी दारूला कच्ची दारू असंही म्हणतात. तिचं मिश्रण करणं अतिशय सोपं असतं. पण या कच्च्या दारूची झिंग म्हणजे त्यामुळं होणारी नशा वाढवण्याच्या नादात ती विषारी बनते.
सामान्यत: गूळ आणि उसाच्या मळीपासून देशी दारू तयार केली जाते. त्यात युरिया आणि बेलाची पानं टाकली जातात. त्यामुळे त्याची नशा आणखी जास्त होते. दारू जास्तीत जास्त चढावी, यासाठी त्यात ऑक्सिटॉसिन टाकलं जातं, ते मृत्यूला निमंत्रण देते.
गेल्या काही वर्षांत अशी माहिती मिळाली आहे की ऑक्सिटॉसिनमुळे वंध्यत्व येतं आणि मज्जासंस्थेशी निगडीत आजार होतात.
त्याच्या सेवनामुळे डोळ्यात जळजळ, खाज आणि पोटात जळजळ होऊ शकते. दीर्घकाळ सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.

फोटो स्रोत, UGC
कच्च्या दारूत युरिया आणि ऑक्सिटॉसिन सारखे रासायनिक पदार्थ मिसळल्यास मिथिल अल्कोहोल तयार होतं आणि त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
मिथिल अल्कोहोल शरीरात जाताच झपाट्याने रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे शरीराच्या आतले अवयव निकामी होतात आणि लगेच मृत्यू ओढवतो.
जे द्रव्य दारू म्हणून विकलं जातं ते 95 टक्के शुद्ध अल्कोहोल म्हणतात. त्याला इथेनॉलसुद्धा म्हणतात.
उसाचा रस, ग्लुकोज, पोटॅशियम नायट्रेट, मोहाची फुलं तसंच बटाटे, भात, जवस, मका असे स्टार्च असलेले पदार्थ एकत्र आंबवून इथेनॉल तयार केलं जातं.
मिथेनॉल का घातक?
इथेनॉलमध्ये आणखी नशा येण्यासाठी त्यात मिथेनॉल टाकलं जातं. त्यात कास्ट अल्कोहोल किंवा कास्ट नॅप्था या नावाने ओळखलं जाणारं मिथेनॉल मिसळलं जातं त्यामुळे दारूचं संतुलन बिघडतं आणि ती धोकादायक बनते.
रसायनशास्त्रातील सर्वांत सोपं सरळ अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल. सामान्य तापमानात ते द्रवरूपात आढळतं.
हे एक रंगहीन आणि ज्वलनशील द्रव्य आहे. त्याचा गंध इथेनॉलसारखाच असतो. त्याचा वापर अँटीफ्रीझर म्हणून, म्हणजे गोठणबिंदू कमी करण्यासाठी केला जातो. तसंच एखादा पदार्थ तयार करण्यासाठी आणि इंधन म्हणूनही मिथेनॉल वापरलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images, UGC
मिथेनॉल अतिशय विषारी असतं, हे इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचा वापर पिण्यासाठी अजिबात केला जात नाही. ते प्यायल्यामुळे मृत्यू ओढवतो तसंच दृष्टी जाण्याचाही धोका असतो.
औद्योगिक क्षेत्रात इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, कारण इथेनॉलची विरघळण्याची क्षमता जास्त आहे. त्याचा वापर वॉर्निश, पॉलिश, औषधं, क्लोरोफॉर्म, कृत्रिम रंग, पारदर्शक साबण, अत्तर आणि इतर द्रव्यं तयार करण्यासाठी होतो.
दारूच्या अनेक प्रकारात, जखमा स्वच्छ करताना जंतू नष्ट करण्यासाठी तसंच प्रयोगशाळेत द्रावण (सॉल्व्हंट) म्हणून त्याचा वापर करण्यात येतो.
दारू विक्रीतून हजारो कोटींचा महसूल
दारू विक्रीतून सरकारला दरवर्षी हजारो कोटींचा महसूल मिळतो आणि या महसूलात वर्षागणिक वाढ झाल्याचं दिसून येतं.
गृह विभागाच्या आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये दारू विक्रीतून सरकारला 15,078 कोटी रुपये महसूल मिळाला, 2021-22 मध्ये 17,228 कोटी रुपये, 2022-23 मध्ये – 21,550 कोटी रुपये, 2023-24 मध्ये – 23,289 कोटी रुपये महसूल मिळाला. 2024-25 मध्ये अंदाजे 30,500 कोटी रुपये महसूल मिळेल असं सांगण्यात आलं होतं. 2025-26 मधील हा अंदाज 32025 कोटी रुपयांचा आहे.
राज्य सरकारनं हॉटेल्स आणि बारमध्ये विदेशी दारू विक्रीसाठी दिलेल्या परवान्यांची संख्या दरवर्षी वाढल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होतं.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये 12865 हॉटेल्स, बारमध्ये विदेशी दारू विक्रीसाठी परवाना होता. 2022-23 मध्ये ही संख्या 15709 वर, 2023-24 मध्ये 17852 वर, 2024-25 मध्ये 19420 वर, तर 2025-26 मध्ये 20567 वर पोहचलीय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























